छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामागे पराक्रमाचा फार मोठा वारसा त्यांना मिळाला होता. त्यांचे पिता शहाजी राजे आणि त्यांचे आजोबा मालोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाने आपला काळ गाजवला होता. याच मालोजी राजांचा जीवनप्रवास कादंबरीच्या रूपाने ‘आदिपर्व’ या पुस्तकात डॉ प्रमिला जरग यांनी शब्दबद्ध केला आहे.
वेरूळच्या बाबाजी राजे भोसले यांचे थोरले पुत्र असलेले मालोजी राजे यांनी आपले संपूर्ण आयुष्य दख्खनचे तख्त असलेल्या निजामशाहीसाठी वेचले. परकीय आक्रमणे तसेच निजामशाही मधील अंतर्गत वादांमुळे झालेल्या प्रत्येक लढाई मध्ये त्यांनी आपले कर्तृत्व दाखवले. आपल्या याच स्वपराक्रमामुळे ते निजामशाही मधील ‘सरगुऱ्हो’ सारख्या सर्वोच्च दरबारी पदावर पोचले.
मालोजीराजे जितके रणांगणात पराक्रमी होते तितकेच आपल्या रयतेची काळजी घ्यायचे. लढाया, दुष्काळ इत्यादींमुळे रयतेची होणारी ससेहोलपट थांबावी यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली. धर्माची श्रद्धास्थाने जपली.
पराक्रमाचा हा मालोजी राजांचा वारसा त्यांचे पुत्र शहाजी राजे यांनी पुढे नेला आणि त्यांचे नातू छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यावर कळस चढवला.
आवर्जून वाचावे असे पुस्तक.